निसटणं आणि टिकणं

        तलावाच्या शहरातल्या तलावापैकी हा एक तलाव, अगदीच छोटेखानी, त्यांचे खोलवरचे सगळे पाण्याचे झरे विरत चालेले, हल्लीच तलावाच्यावरुन एका उडडाणपूलाचं बांधकाम झाल्यापासून तर तिथल्या पाण्यात सूर्यकिरणं यायला वावच राहिला नव्हता, या असल्या वातावरणात तिथं तंग धरु शकतील असे वनस्पतीजीव, जलचराचं मात्र यामुळे फारच हाल होतं होते. इथं अस्तित्वच टिकुन न राहण्याची परिस्थिती उत्पन्न होऊन बसली होती आणि या सगळयात शहरात माजलेला अस्वच्छतेपणाचा कहर या पाण्यालासुदधा लागू होत होता, कारण काही निलाजरे लोक या तलावाच्या शेजाराच्या कचराकुंडीत कचरा टाकायच्याऐवजी सरळ या तलावात कचरा टाकत सुटत…… उच्छाद मांडला होता नुसता…… आणि त्यात भरीस भर म्हणून तलावाला लागून असलेल्या मोठाल्या झाडाची सुकलेली पानं सरळ या तलावाच्या पाण्यात पडत आणि त्या कुजलेल्या पानांमुळे आधीपासूनच तलावाला एक कुजडं वास येत होता…… आतले ते जीव, जलचर मेटाकुटीला आले होते… जलचर म्हणजे काही थोडंथोडक्या माश्यांचा हजार-एक जणाचा गोतावळा, इथल्या अश्या अवस्थेमुळे त्यांच्या जिवंत राहण्यावरच संकट येणार होतं, आजूबाजूची परिस्थिती प्रतिकूल बनत असताना स्वतःमध्ये गरजेचे बदल घडवत, आपलं अस्तित्व टिकवण्याचा आपसूक प्रयत्न चालू राहणं ही एक बाब झालीच पण असं अचानक शारिरिक बदल घडवणं इतकं सोपं नाहीयं, त्यासाठीचे बदल अंगभूत होण्यासाठी हजारो वर्ष जावी लागतात….. बहुतेक इथेचं खितपत पडत अवेशष होणार….हो तेच सत्य होतं….जर जिवंत राहायचं असेल तर इथून बाहेर पडणं गरजेचं होतं….

****************

आज कितीतरी दिवसानंतर त्या तलावाच्या पाण्यात कुणीतरी गळ टाकला होता, त्या गळाला पीठ लावलं होतं, आजूबाजूचे ते सगळे जलचर सावध होऊन दूर सरत होते, इथं असं केविलवाणं जगत असताना अजून कुणीतरी त्यांच्या जीवावर उठलं होतं, तिथंल्या त्या गोतावळातले मोठे जलचर लहानग्यानां त्या गळापासून दूर सारत होती, पण एकजण होता तो म्हणत होता “इथून निसटण्याचा हाच रस्ता आहें, जर तुम्हाला या नरकातून बाहेर पडायचं असेल तर एवढं साहस करावचं लागेल नाहीतरी इथं असं सडून मरण्यापेक्षा एका दमात नष्ट होणं बरं”. प्रत्येकजण विचार करत होता, पण सगळ्यानाचं त्यांच बोलणं पटत नव्हतं, काही म्हटलं तरी प्रत्येकाला आपला जीव प्यारा होता…………

****************

त्या विचाराच्या गर्तेत अचानक गळ जड वाटू लागला, एक जण लागला गळाला… त्याने त्यांच्या जवळच्या पाणी भरलेल्या पारदर्शक पिशवीत तो एकमेव मासा टाकला….. आज कितीतरी दिवसांनी तो मासा स्वच्छ पाण्यात विहार करत होता…. आणि तो मात्र धाप लागेपर्यंत धावत शाळेकडे निघाला….

****************

 ऊन थोडसं वाढत होतं….साधारण पावणेबारा वाजले होते, शहरातल्या सगळ्यात छोटया तलावापाशी तो येऊन ठेपला, त्यांने आपल्यासोबत आणलेला गळ काढायला सुरवात केली, संतू त्याचं नाव, शाळेचेचं कपडे घालून आलेला, नववी इयत्तेत शिकतोय, त्याला दुपारी बाराची शाळा खुणावत होती. आज पहिलाच तास विज्ञानाच्या मास्तराचा. ते प्रयोगशाळेत नेणार होते, कायमचे बंद काचेत बाटलीत रसायनात घालून ठेवलेले साप, बेडूक बघायला भेटायचे….विज्ञानप्रयोगातल्या मत्यस्यजमातीच्या विषयीचं प्रात्याक्षिक म्हणून एक जिवंत मासा आणायची जबाबदारी संतूवर होती… गळ टाकल्यापासून कितीतरी वेळ झाला गळाला काही लागत नव्हतं, कधी एकदा गळ जड वाटतोय असं वाटत होतं….. तसे तलावात मासें होते ब-यापैकीं पण का कुणास ठाऊक आज वेळ लागत होता ? …

****************

        संतू पोचला शाळेत. तास सुरु झाला. विज्ञानाचे शिक्षक सांगत होते. “अमीबा या एकपेशीय प्राण्यांपासून सुरु झालेल्या प्रवासात……….” अधिकाशं मुलाचं या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. प्रयोगशाळेत एका काचेच्या भांडयातल्या त्या माश्याकडें मुलं कुतूहलतेने पाहत होते आणि तो मासा त्या शिक्षकाचं म्हणणं समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. त्याला आता आशा लागून राहली होती कदाचित आपले जातभाई स्वतःत बदल घडवून टिकून राहतील तलावाच्या शहरात…..

*******समाप्त********

-लेखनवाला    

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . ) 

Leave a comment